अहमदाबाद,दि.29: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वादग्रस्त वक्तव्य न करण्याचा इशाऱ्या भाजपच्या वाचाळवीर नेत्यांनी ठेंगा दाखवला आहे. गुजरातमधील विधानसभेचे अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी गांधीनगरमध्ये आयोजित ब्राह्मण व्यापार परिषदेत नुकतेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्राह्मण असल्याचे म्हटले आहेत. एवढेच नाही तर श्रीकृष्ण ओबीसी होता, संदीपन ऋषींनी त्यांना देव केले. चंद्रगुप्त मौर्य, श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या यशात ब्राह्मणांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या काळात चाणक्यही राजा होऊ शकला असता. मात्र, चाणक्याला सत्तेची हाव नव्हती. ब्राह्मणांनी नेहमीच संपूर्ण समाजाचा विचार केला, असे त्रिवेदी यांनी म्हटले. त्रिवेदींनी हे विधान केले त्यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री विजय रुपानी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल हेदेखील उपस्थित होते. परिणामी, त्रिवेदींच्या वक्तव्याची दखल भाजप घेणार का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदार आणि आमदारांनी ऊठसूठ कोणत्याही विषयावर तोंड उघडून माध्यमांना मसाला पुरविण्याचे आणि परिणामी पक्षाला व सरकारला नाहक वाईटपणा आणण्याचे प्रकार बंद करावेत, असा इशारावजा सल्ला दिला होता. मात्र, मोदींच्या या सल्ल्याला भाजपच्या नेत्यांनी केराची टोपली दाखवली आहे.
No comments:
Post a Comment