Tuesday 21 April 2020

कोरोनाविरुध्दच्या लढाईत सर्वांनी एकत्र यावे- गृहमंत्री अनिल देशमुख

यवतमाळ, दि.21 : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने सर्व विभागामध्ये अतिशय चांगला समन्वय घडवून आणला असून प्रशासनाचे काम उत्तम आहे. कोरोना विरुध्दची लढाई ही सर्वांच्या सहकार्याने लढणे आवश्यक असल्यामुळे या लढाईत सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, आमदार सर्वश्री ख्वाजा बेग, डॉ. अशोक उईके, डॉ. संदीप धुर्वे, जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार आदी उपस्थित होते.
3 मे पर्यंत सर्व राज्य व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्याचे आदेश देण्यात आले आहे, असे सांगून गृहमंत्री श्री. देशमुख म्हणाले, जिल्ह्यात असलेल्या परप्रांतीयांची व इतर जिल्ह्यातील नागरिकांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाला करण्याचे आदेशित केले आहे. आहे त्या ठिकाणी राहणे, हाच सध्या एकमेव मार्ग आहे. कुटुंबात एखाद्याचे निधन किंवा कोणी अतिशय गंभीरावस्थेत असले तर अशा परिस्थितीत जिल्हास्तरावरील समितीकडून परवानगी घेऊन संबंधितांना जाता येऊ शकते. शासनाच्या वतीने अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सर्वांना लाभ तसेच बीपीएम, एपीएल, अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांना धान्य देण्यात येत आहे. ज्या नागरिकाकडे राशन कार्ड नाही, अशा लोकांसाठी जिल्हास्तरावर विशेष निधीची तरतूद करून त्यांना प्राधान्याने धान्य पोहचवावे, अशा सुचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.
यावेळी पालकमंत्री संजय राठोड म्हणाले, आदिवासी बहुल जिल्हा असल्यामुळे खावटी देण्याचा निर्णय शासनाच्या वतीने लवकरात लवकर घेण्यात येईल. तसेच ज्यांच्याकडे कार्ड नाही त्यांना धान्य देण्यासाठी निधीची तरतूद करण्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी आमदारांनी शासन व प्रशासनाच्या कामाचे कौतुक केले. तसेच काही सुचना देखील त्यांनी केल्या.

गृहमंत्र्यांची मेमन सोसायटीमध्ये पाहणी : यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शहरातील प्रतिबंधित असलेल्या मेमन सोसायटीमध्ये भेट देऊन प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी बोलतांना गृहमंत्री म्हणाले, जिल्हा व पोलिस प्रशासन चांगले काम करीत असून सर्व विभागचा समन्वय चांगला आहे. कोरोना संदर्भात डॅशबोर्डच्या माध्यमातून नागरिकांना रोज अपडेट माहिती उपलब्ध होते. ग्रामस्तरावरील सर्व यंत्रणा चांगल्या काम करीत असून इंदिरा नगर, जाफर नगर, मेमन सोसायटी हा भाग पूर्णपणे सील करण्यात आला आहे. या भागात प्रशासनाच्यावतीने अत्यावश्यक सेवा पुरविण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 63 तबलिगी समाजाचे लोक आले होते. यासर्वांकडे प्रशासनाने अतिशय गांभिर्याने लक्ष दिले. सोशल मिडीयाच्या माध्यमातून सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी. असे आढळल्यास त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल. यवतमाळ जिल्हा लवकरच रेड झोनमधून ऑरेंज व नंतर ऑरेंज झेानमधून ग्रीन झोनकडे वाटचाल करेल, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी त्यांनी एकूण 670 चाचण्या करण्यात आल्याचे सांगितले. तसेच आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 16 पॉझेटिव्ह रुग्णांपैकी 9 जणांना सुट्टी देण्यात आली असून सद्यस्थितीत 7 पॉझेटिव्ह रुग्ण भरती आहे. संस्थात्मक विलगीकरणात एकूण 142 जण तर गृह विलगीकरणात एकूण 789 जण असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...