28 March: शाळेच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुलांनी शाळेत येणे अपेक्षित आहे.
शिक्षण विभागाचे आदेश; विद्यार्थ्यांची उपस्थिती बंधनकारक
परीक्षा संपल्या की मामाच्या किंवा बाबांच्या गावाला जाण्यासाठी आतुर झालेले विद्यार्थी आणि बस-रेल्वेमधील तिकिटांचे आरक्षण करून प्रवासाची आखणी अंतिम टप्प्यात आणणाऱ्या पालकांना शिक्षण विभागाने तडाखा दिला आहे. परीक्षा संपली की शाळेचे वर्ष संपले हा वर्षांनुवर्षीचा प्रघात यंदापासून बंद होणार आहे. या वर्षी वार्षिक परीक्षा झाली तरीही शाळेला कागदोपत्री सुट्टी लागेपर्यंत मुलांना शाळेत जावे लागणार आहे. त्यामुळे दरवर्षी एप्रिलच्या मध्यावर बंद होणाऱ्या शाळा चक्क १ मेपर्यंत मुलांसाठी सुरू राहणार आहेत. दरवर्षी परीक्षा संपली की दुसऱ्या दिवसांपासून उन्हाळी सुट्टी सुरू होते. दहावीची परीक्षा झाली की शाळेच्या परीक्षा आणि त्यानंतर साधारण मार्च अखेर किंवा एप्रिलमध्ये मुलांना सुट्टी असते. त्यानंतर एप्रिल अखेर किंवा १ मे रोजी निकाल आणि मग महिनाभर शिक्षकांनाही सुट्टी असे शाळेचे वार्षिक वेळापत्रक असे. यंदापासून मात्र हे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. पहिली ते नववीच्या राज्यमंडळाच्या शाळा १ मे पर्यंत सुरू ठेवाव्यात असे आदेश विद्या प्राधिकारणाने दिले आहेत. या कालावधीत मुलांसाठी उपक्रम, उन्हाळी शिबिरे आयोजित करावीत अशाही सूचना देण्यात आल्या आहेत. शाळेच्या शेवटच्या दिवसापर्यंत मुलांनी शाळेत येणे अपेक्षित आहे.
No comments:
Post a Comment