नवी दिल्ली,दि.17(वृत्तसंस्था) - देशाच्या प्रथम नागरिकाच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीसाठी संघासह सर्वपक्षीय सहमती घडविण्यासाठी आटापिटा दाखविणाऱ्या भाजपतर्फे या पदासाठी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे नाव आजच्या घडीला सर्वांत आघाडीवर असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून खकळते आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर जाण्याआधी; म्हणजे 23 तारखेला व अमावस्या टाळायची असेल तर 22 तारखेला भाजप उमेदवारची घोषणा होणे अपेक्षित आहे. स्वतः सुषमा यांनी ठाम नकार दिला तर मोदी आपल्या मनातील व अतिशय नवख्या उमेदावारचे नाव ऐनवेळी पुढे करून धक्का देऊ शकतात असे समजते.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भोजनाच्या निमित्ताने भेट घेतली. राष्ट्रपती भवनात उभयतांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. ही फेअरवेल भेट असल्याचे सांगण्यात आले. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठीच्या वेगवान घडामोडी राजधानीत घडत आहेत. या पदासाठी भागवतांसह द्रौपदी मुर्मू, मेट्रो-मॅन श्रीधरन, एम. एस. स्वामिनाथन, ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर आदी नावांच्या चर्चा अखंड सुरू होत्या. गृहमंत्री राजनाथसिंह व ज्येष्ठ मंत्री वेंकय्या नायडू यांनी आज तिन्ही त्रिकाळ भेटीगाठींचा धडाका उडवून दिला होता. या दोघांनी सायंकाळी भाजपचे भीष्माचार्य लालकृष्ण अडवानी यांची भेट घेतली. विशेषतः अडवानी यांना भेटून दोन्ही नेत्यांच्या वाहनांचा ताफा बाहेर पडल्यावर सुषमा स्वराज यांच्या नावाची चर्चा अतिशय गंभीरपणे सुरू झाली. अडवानी यांनी चार वर्षांपूर्वीच सुषमा स्वराज यांच्या नावास पहिली पसंती दिली होती. राजनाथसिंह व नायडू यांच्याशी भेटीतही अडवानी यांनी आपल्या मताचा पुनरुच्चार केल्याचे समजते.
उत्कृष्ट वक्त्या व उत्तम प्रशासक असलेल्या सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र मंत्री म्हणून आपली छाप पाडली आहे. जयप्रकाश आंदोलनाची देणगी असलेल्या सुषमा स्वराज यांचे सोनियांसह सर्व पक्षीय नेत्यांशी उत्तम संबंध आहेत.
अडवानी म्हणाले तर...
अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणेच सर्वसहमतीनेच राष्ट्रपती निवडण्याचा मोदींचा अट्टाहास असेल तर आजच्या घडीला सुषमा स्वराज यांच्याशिवाय दुसरे नावच त्यांच्यासमोर नाही असे भाजप सूत्रांनी नमूद केले. मात्र शस्त्रक्रियेनंतर सक्रिय झालेल्या सुषमा स्वराज राष्ट्रपतिपदाचा फुलस्टॉप लावून घेण्यास तयार आहेत का, हा खरा प्रश्न आहे. अडवानींची इच्छा म्हटल्यावर त्या नकार देऊ शकणार नाहीत असा भाजपचा होरा आहे.
अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणेच सर्वसहमतीनेच राष्ट्रपती निवडण्याचा मोदींचा अट्टाहास असेल तर आजच्या घडीला सुषमा स्वराज यांच्याशिवाय दुसरे नावच त्यांच्यासमोर नाही असे भाजप सूत्रांनी नमूद केले. मात्र शस्त्रक्रियेनंतर सक्रिय झालेल्या सुषमा स्वराज राष्ट्रपतिपदाचा फुलस्टॉप लावून घेण्यास तयार आहेत का, हा खरा प्रश्न आहे. अडवानींची इच्छा म्हटल्यावर त्या नकार देऊ शकणार नाहीत असा भाजपचा होरा आहे.
No comments:
Post a Comment