करमाळा दि.08- वीट (ता. करमाळा) येथील शेतकरी धनाजी चंद्रकांत जाधव (वय 42) यांनी कर्जाला कंटाळून बुधवारी रात्री नऊ वाजता आत्महत्या केली.
त्यांनी मृत्युपूर्वी "मी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आल्याशिवाय मला जाळायचे नाही,' अशा आशयाची चिठ्ठी लिहिली. ती त्यांच्या खिशात सापडली.
बुधवारी नऊ वाजता वीट गावातून आल्यानंतर जाभुंझरा वस्तीवरील शेतातील चिंचेच्या झाडाला गळ्यातील गमजाने (पंचा) त्यांनी गळफास घेतला. राज्यभर सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर ही आत्महत्या झाली आहे.
आपली मुले योगीराज व युवराज यांच्याकडे लक्ष ठेवण्याची विनंतीही त्यांनी चिठ्ठीत केली आहे. योगीराज हा बारावीत तर युवराज नववीत शिकत आहे. पत्नी, आई-वडील असा त्यांचा परिवार आहे. त्यांचे पार्थिव रात्री उशिरा शवविच्छेदनासाठी करमाळा येथे हलविण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येईपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.
No comments:
Post a Comment