Tuesday 21 November 2017

जादूटोणा विरोधी कायदयाने प्रत्येक व्यक्ती विज्ञानवादी होईल-प्रा.श्याम मानव

 गोंदिया,दि.२१ : स्त्री ही अनंत काळाची माता आहे. तिचा सन्मान झाला पाहिजे, तरच स्त्रीचे शोषण थांबेल. धर्माचा वापर करुन स्त्रियांचे मोठ्या प्रमाणात शोषण करणारी यंत्रणा वर्षानुवर्षे सुरु आहे. जादूटोणा विरोधी कायदयाची प्रभावी अंमलबजावणी केली तर प्रत्येक व्यक्ती हा विज्ञानवादी होईल. असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे संस्थापक संघटक तथा राज्य जादूटोणा विरोधी कायदयाची अंमलबजावणी करणाऱ्या समितीचे सहअध्यक्ष प्रा.श्याम मानव यांनी केले.
         गोंदिया येथील संथागार येथे १९ नोव्हेंबर रोजी वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया आणि जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर जाहीर व्याख्यान देतांना प्रा.मानव बोलत होते. यावेळी पालकमंत्री राजकुमार बडोले, पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे जिल्हा संघटक प्रा.डॉ.प्रकाश धोटे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे, निशा भूरे, संजय झुरमूरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
         प्रा.मानव पुढे म्हणाले, आमचा देवाधर्माला विरोध नाही. देवाधर्माच्या नावाखाली सामान्य माणसाच्या फसवणूकीला आमचा विरोध आहे. वारकरी संप्रदायाने समाजाचे प्रबोधन करण्याचे काम केले. या प्रबोधनातून त्यांनी लोकांमधील अंधश्रध्दा दूर केल्या. अस्पृश्यता माणसाबाबत पाळली जायची, जातीयतेची दरी कमी करण्याचे काम सुधारकांनी केले. सुधारकीय मनोवृत्तीतून सामान्य माणसाला जागृत केले. संत परंपरा आणि बुवाबाजी ही वेगळी आहे. लहानपणी शिकविल्या जाते की, श्रध्दा ठेवली पाहिजे. ज्याच्यावर श्रध्दा ठेवायची त्याच्याबद्दल शंका ठेवू नये. श्रध्देचे रुपांतर केव्हा अंधश्रध्देमध्ये होते हे कळत नाही. त्यामुळे श्रध्दा ही डोळस असली पाहिजे, ती आंधळी नसावी. तिची चिकित्सा करता आली पाहिजे, यासाठी जादूटोणा विरोधी कायदा असल्याचे त्यांनी सांगितले.
        जादूटोणा विरोधी कायदयानुसार गुन्हा घडत असेल तर पोलिसांकडे तक्रार केली पाहिजे असे सांगून प्रा.मानव म्हणाले, मंत्राने साधा पापळ मोडता येत नाही. पापळ मोडणाऱ्या बाबाला २५ लक्ष रुपये बक्षीस म्हणून देण्यात येईल. मंत्राने माणूस मेला असता तर कट्यार बाळगता आली नसती. जगात कुणालाही करणी करता येत नाही. मानसिक रुग्णाचा वापर बाबा म्हणून कुणी करीत असेल तर तो गुन्हा आहे. नवसाने मुले झाली असती तर पती करण्याची गरज नसती असे तुकारामांनी अभंगात लिहिले आहे. गाडगेबाबांनी बुध्दीप्रामाण्यवाद कसा वापरायचा हे शिकविले असल्याचे त्यांनी सांगितले.
         वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया या विषयावर प्रकाश टाकतांना प्रा.मानव म्हणाले, डेरा सच्चा सौदाचा नायक बाबा राम रहीम हा एका रात्रीतून खलनायक कसा झाला. प्रसारमाध्यमांनी गुरुमीत राम रहिमच्या अनेक गोष्टी जगापुढे आणून खळबळ माजविली. स्त्रीयांचे शोषण करणाऱ्या गुरुमीत राम रहीम, पुण्याजवळच्या नारायणगाव परिसरातील केडगावकर महाराज, काटोलचे गुलाबबाबा, स्वामी विद्यानंद, स्वामी विद्यानंदचे वर्धेतील किस्से, आसारामबापूच्या रासक्रीडांची माहिती, आसारामबापूचा मुलगा नारायणसाईनेही मुलींचा कसा उपभोग घेतला याची माहिती, कृपाळू महाराज, रामस्नेही पंथाचा सुंदरदास महाराज, बंगलोरचा स्वामी नित्यानंद, हिवरा आश्रमचे शुकदास महाराज, स्वामी दत्तानंद निश्चल स्वामी, पाटीलबाबा यांनी केलेल्या महिला व मुलींच्या शोषणाचा लेखाजोखाच प्रा.मानवांनी मांडला. शेकडो मुलीचे व स्त्रीयांचे शोषण करणाऱ्या या बाबांना नेस्तनाबूत करण्याची ताकद या कायदयात असल्याचे दाखवून दिले आहे. अनेक बुवा-बाबा आज गजाआड असल्याचे त्यांनी सांगितले. काही धर्मातील पुरोहित, मौलवी, बाबा, पादरी हे धार्मिक तरतूदीचा वापर आपल्या फायदयासाठी करुन घेवून त्यातून स्त्री शोषणाचा मार्ग शोधून काढत असल्याचे सांगितले.
         प्रा.मानव म्हणाले, या कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या अधिनस्त समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचे अध्यक्ष म्हणून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री आहेत, तर सहअध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती झाल्याचे त्यांनी सांगितले. या कायदयाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
        वृक्ष तेथे छाया ! बुवा तेथे बाया हे अतिशय महत्वाचे वाक्य आचार्य प्र.के.अत्रे यांनी वापरल्याचे सांगून प्रा.मानव म्हणाले, जसा वृक्ष छायेशिवाय असू शकत नाही तसाच कोणताही बुवा बायकांशिवाय असू शकत नाही. पुण्याजवळच्या नारायणगाव परिसरातील केडगावकर हा उच्चभ्रू बाबा उच्चभ्रू सुशिक्षीत स्त्रीयांमध्ये अतिशय प्रसिध्द होता. तो महिलांचे शोषण कशाप्रकारे करायचा त्याच्या रासलिलांचा भांडाफोड आचार्य अत्रे यांनी केल्याचे प्रा.मानव यांनी सांगितले यावेळी त्यांनी जादूटोणा विरोधी कायद्याच्या सर्व १२ कलमांची माहिती दिली. कार्यक्रमाला विद्याथी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन व उपस्थितांचे आभार अमर वऱ्हाडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...