Friday 24 November 2017

भारत सरकारनेच रोहितची हत्या केली- राहूल गांधी



अहमदाबाद,दि.24 - ‘रोहित वेमुलाचा मृत्यू आत्महत्या नसून तो भारत सरकारकडून करण्यात आलेला खून आहे,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी सरकारला लक्ष्य केले. अहमदाबादमध्ये दलित स्वाभिमान सभेला संबोधित करताना राहुल गांधींनी हैदराबाद विद्यापीठाचा विद्यार्थी असलेल्या रोहित वेमुलाच्या मृत्यूवरुन मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.  
‘हैदराबाद विद्यापीठात शिकणाऱ्या रोहित वेमुलाने आत्महत्या केली नाही तर भारत सरकारने त्याची हत्या केली,’ असे म्हणत राहुल गांधींनी मोदी सरकारवर शाब्दिक हल्ला चढवला. ‘रोहित वेमुला विद्यापीठात जाऊन शिक्षण घेण्याची हिंमतच कशी काय करु शकतो? असे पत्र मंत्र्यांकडून येते आणि त्याची हत्या केली जाते,’ असे राहुल गांधींनी म्हटले. हैदराबाद विद्यापीठातील रोहित वेमुलाने १७ जानेवारी २०१६ मध्ये वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली होती. विद्यापीठाकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याने तणावग्रस्त स्थितीत त्याने हे पाऊल उचलले, अशी शक्यता त्यावेळी व्यक्त करण्यात आली होती.
रोहित वेमुलाच्या आत्महत्येचे देशभरात पडसाद उमटले होते. तत्कालीन मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्यावर या प्रकरणी मोठी टीका झाली होती. यासोबतच केंद्रीय कामगार मंत्री बंडारु दत्तात्रय यांनाही विरोधकांनी लक्ष्य केले होते. या प्रकरणात बंडारु दत्तात्रय यांनी पत्रव्यवहार केल्याने काँग्रेससह सर्वच विरोधकांनी मोदी सरकारला धारेवर धरले होते. दोन मंत्री एकाच प्रकरणात वादात सापडल्याने त्यावेळी मोदी सरकार कोंडीत सापडले होते.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...