Tuesday 21 November 2017

सशक्त समाज निर्मितीसाठी जादूटोणा विरोधी कायदा उपयुक्त- पालकमंत्री बडोले

 गोंदिया,दि.२१ : समाजातील अनिष्ट परंपरा, वाईट चालीरिती, अंधश्रध्दा, शोषण व बुवाबाजीच्या नावावर होणारी लुटमार थांबविण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा शासनाने केला आहे. या कायदयाची जनजागृती करण्याचे काम सामाजिक न्याय विभाग करीत आहे. अंधश्रध्देचे निर्मुलन करुन सशक्त समाज निर्माण करण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा अत्यंत उपुयक्त असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
      अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मुलन समिती शाखा गोंदिया व जादूटोणा विरोधी कायदा प्रचार-प्रसार अंमलबजावणी समितीच्या वतीने अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे संस्थापक संघटक प्रा.श्याम मानव यांचे १९ नोव्हेंबर रोजी गोंदिया येथील संथागार येथे आयोजित वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे बाया आणि जादूटोणा विरोधी कायदा या विषयावर जाहीर व्याख्यान कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी प्रा.श्याम मानव, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.दिलीप पाटील-भूजबळ, अनिसचे जिल्हा संघटक प्रा.डॉ.प्रकाश धोटे, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त देवसुदन धारगावे, तहसिलदार कल्याण डहाट, निशा भूरे, संजय झुरमूरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
      पालकमंत्री बडोले म्हणाले, समाजातील अंधश्रध्देचे निर्मुलन व्हावे यासाठी प्रा.श्याम मानव हे अत्यंत चांगले काम करीत आहे. पाहिजे त्या प्रमाणात या कायदयाचा प्रचार-प्रसार होत नाही. मोठ्या प्रमाणात या कायदयाचा प्रचार-प्रसार होणे गरजेचे आहे. भोळ्याभाबळ्या लोकांना फसविण्याचे काम बुवाबाबा मंडळी करीत आहे. त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे. गाव पातळीपर्यंत या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
      जादूटोणा विरोधी कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगून श्री.बडोले पुढे म्हणाले, देवाधर्माच्या नावाने सामान्य माणसाची होणारी लुट थांबली पाहिजे. सामाजिक न्याय विभाग हा कायदा प्रभावीपणे राबविण्यासाठी वचनबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.
      पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ म्हणाले, शिक्षीत सुशिक्षीत मंडळीसुध्दा आज श्रध्देमुळे अंधश्रध्देला बळी पडत आहे. सुशिक्षीत आणि सुसंस्कृत समाज अंधश्रध्देला बळी पडणे म्हणजे समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने ही बाब धोकादायक आहे. जिल्ह्यात जादूटोणा विरोधी कायदयाची माहिती पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना व्हावी यासाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेमुळे कायदयाच्या तरतुदीची माहिती कशाप्रकारे गुन्हे दाखल करावे याची माहिती मिळण्यास मदत झाल्याचे त्यांनी सांगितले.
      व्याख्यानामुळे कायदा प्रभावीपणे राबविण्यास उर्जा मिळणार असल्याचे सांगून डॉ.भूजबळ म्हणाले, जिल्ह्यात या कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सुध्दा मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा.डॉ.प्रकाश धोटे यांनी केले. संचालन व उपस्थितांचे आभार अमर वऱ्हाडे यांनी मानले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...