सामाजिक कार्यकर्ते नरेश जैन यांचा आरोप
पाच दिवस उशिरा सुरू केल्या फेऱ्या
देवरी-ग्रामीण भागातील विद्यार्थिनींकरिता शाळा ते घर ने-आण करण्यासाठी शासनाने मानव विकास योजनेतून बसेस खरेदी केल्या. या बसेस चालविण्याची जबाबदारी असणाऱ्या परिवहन महामंडळाने दिवाळीच्या सुट्यानंतर चक्क पाच दिवस उशिराने फेऱ्या सुरू केल्या. परिणामी, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाले आहे. एसटी महामंडळाने मानव विकास योजनेच्या बसेसचा गैरवापर केल्याचा आरोप देवरीचे सामाजिक कार्यकर्ते नरेश जैन यांनी केला असून शासनाने या प्रकरणाची दखल घेऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षणविभागाने गेल्या 11 जानेवारी 2016 ला पत्र देऊन वर्ग 5 ते 12 च्या विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्या 27 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर पर्यंत सुट्या राहणार असल्याचे कळविले होत. त्यामुळे महामंडळाने मानव विकासच्या बसेस 10 नोव्हेंबर पासून सुरू करणे अपेक्षित होते. परंतु गोंदिया, तिरोडा आणि साकोली या आगारातील बसेस तब्बल पाच दिवस उशिराने 15 तारखेला सुरू करण्यात आल्या. एसटीच्या अधिकाऱ्यांनी आपल्या आगाराचे उत्पन्न वाढविण्यासाठी या बसेसचा गैरवापर केल्याचा आरोप मानव विकास समितीचे निमंत्रित सदस्य नरेश जैन यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार त्यांनी जिल्हाधिकारी , मानव विकास आयुक्त आणि जिल्हा परिषदेला केली आहे.
No comments:
Post a Comment