Thursday 18 July 2019

दुचाकी, जमीन मालकीची असल्यास रेशनकार्ड रद्द करण्याचा निर्णय नाही

गोंदिया,दि.18 (पराग कटरे)- दुचाकी किंवा चारचाकी असेल किंवा तुमचे शेतीचे उत्पन्न वाढले, तर शिधापत्रिका रद्द होऊ शकते. अशा वावड्यांनी रेशनधारकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. पण बुधवारला सरकारनेच याबाबत परिपत्रक जारी करून लाखो रेशनधारकांना दिलासा दिला आहे.
राज्यात आधार लिंक झालेले साधारण दीड कोटींपेक्षा जास्त रेशनकार्डधारक आहेत. प्राधान्यक्रम रेशनकार्डच्या लाभार्थ्यांना शहरात 59 हजारांच्या उत्पन्नाची अट आहे, तर ग्रामीण भागात 44 हजारांची अट आहे. त्यामुळे दुचाकी किंवा कार असणार्‍या लाभार्थी श्रीमंत समजून सरकार, त्यांचे रेशन कार्ड रद्द करू शकतात,अशा वावड्या उठल्या होत्या. परिणामी काही रेशनधारक धास्तावले होते. यासंबंधात अन्न नागरी पुरवठा विभागाने परिपत्रक प्रसिध्द करत त्यात अस्तित्वात असलेल्या रेशनकार्ड धारकांच्या दुचाकी व चारचाकी वाहन तसेच जमिनीची मालकी असल्यास कुटुंबांचे रेशनकार्ड रद्द करण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे नमूद केले आहे.
शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रीया आहे. त्यानुसार निकषात न बसणारे रेशनकार्ड तात्काळ अपात्र ठरवून त्या रद्द करण्यात याव्यात व संबंधितांच्या मागणीनुसार त्यांना अन्य रेशनकार्ड देण्याची कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे दुबार, अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती, मयत व्यक्ती व अपात्र रेशनकार्ड शोधमोहिम घेऊन ती रेशनकार्ड रद्द करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...