Sunday 21 January 2018

मोदींना पदाचा इगो, शेतकऱ्याबाबतच्या एकाही पत्राला उत्तर नाही : अण्णा

सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये आयोजित सभेत अण्णा बोलत होते.

सांगली २१
 ''शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत मागील 3 वर्षात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 30 हून अधिक पत्रं लिहिली. मात्र यातील एकाही पत्रावर त्यांचं उत्तर आलं नाही. मोदींना पंतप्रधानपदाचा इगो आहे, म्हणूनच ते उत्तर देत नाहीत'', अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे.

सांगली जिल्ह्यातील आटपाडीमध्ये आयोजित सभेत अण्णा बोलत होते. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि जनलोकपालच्या अंमलबजावणीसाठी अण्णा पुन्हा एकदा 23 मार्चपासून दिल्लीत आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या तयारीसाठी महाराष्ट्रामध्ये अण्णा तीन सभा घेणार असून त्यातील पहिली सभा आटपाडीमध्ये पार पडली.

''माझी आंदोलने, माझ्या सभा या मतं मिळवण्यासाठी नसतात. लोकपालसाठी जसं दिल्लीत आंदोलन झालं, तसंच आता शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोठं आंदोलन होईल असा विश्वास आहे'', असंही अण्णा म्हणाले.

''कुठे आंदोलन झालं नाही, असं आंदोलन करत जेलभरो आंदोलन करून सरकारला धडकी भरवू'', असा इशाराही त्यांनी या सभेत दिला.

लोकपाल आणि लोकायुक्त यांच्या नियुक्तीबरोबर स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव द्यावा, विजेची समस्या कायमस्वरूपी सोडवावी, शेतकऱ्यांना 5 हजार रुपये पेन्शन द्यावं, निवडणूक पद्धतीत सुधारणा करावी, यांसह अनेक मागण्या घेऊन अण्णा आंदोलन करणार आहेत.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...