मुंबई,दि.21- राज्यातील
अनुदानास पात्र ठरलेल्या विनाअनुदानित शाळांतील शिक्षकांना वेतनासाठीच्या
अनुदानाची आणि औरंगाबाद येथे शिक्षकांवर टाकण्यात आलेली कलमे मागे
घेण्यासाठी लेखी आश्वासन दिल्याशिवाय आपले बेमुदत उपोषण मागे घेणार नाही,
अशी दोन दिवसांपूर्वी वल्गना करणा-या पुणे आणि अमरावतील विभागातील दोन
शिक्षक आमदारांनी बुधवारी कोणत्याही लेखी आश्वासनाशिवाय आपले उपोषण मागे
घेतले. यामुळे राज्यात या दोन्ही आमदारांनी उपोषणाच्या नावाखाली स्टंटबाजी
केली असल्याच्या चर्चा रंगल्या असून शिक्षकांसाठी इतकाच कळवळा होता तर लेखी
आश्वासन का घेतले नाही, असा सवाल शिक्षकांकडून उपस्थित केला जात आहे.
पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय
सावंत आणि अमरावतीचे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी सोमवारपासून
आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले होते. मात्र उपोषणाच्या दुस-या रात्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि दोनही आमदारांनी
कोणत्याही लेखी आश्वासनाशिवाय उपोषण मागे घेतल्याचे जाहीर केले. त्यामुळे
या आमदारांच्या उपोषणावर शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
No comments:
Post a Comment