Thursday 20 October 2016

टोयागोंदीच्या महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार

सालेकसा,दि.20 : महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर असलेल्या व सालेकसा तालुक्यातील आदिवासी अतिदुर्गम भागातील टोयागोंदी या गावातील महिलांनी गावात दारूबंदी करून अवैध दारू विक्री तत्काळ बंद करावी यासाठी सरळ सालेकसा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला.
 मोर्चाचे नेतृत्व टोयागोंदी येथील सरपंच गीता लिल्हारे, उपसरपंच रत्नकला पटले यांनी केले असून यात ज्योती साखरे, गितेश्‍वरी साखरे, गीता वट्टी, पुष्पा पंधरे, मीना मरकाम, डुलेश्‍वरी मच्छिरके, ज्योती अशोक साखरे, चंपा सहारे, सविता साखरे, चंद्रकला भलावी, कला सवासेठी, माया भोंडेकर, जानकी अलकरा, सरीता भोंडेकर, विमला मरकाम, मीना टेंभुकर, मन वट्टी, अग्रता लिल्हारे, सोनकी रतोने, कविता वट्टी, निर्मला लिल्हारे, जामवंती ढेकवार सहभागी झाल्या.
टोयागोंदी या गावात अनेक वर्षापासून अवैध दारूचा व्यवसाय काही लोक करीत आहेत. त्यामुळे गावातील वातावरण बिघडले आहे.दारूमुळे तरूण वर्गासह बालकांचाही कल मद्यपानाकडे वाढत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मद्यपान करणार्‍यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. याचा दुष्प्रभाव गावातील सामाजिक स्वास्थ्यावर पडत असून गावातील महिलांना व मुलींना असुरक्षित वाटू लागले आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. गावात पूर्णपणे दारूबंदी करावी यासाठी आधीसुध्दा निवेदन देण्यात आले.परंतु दारूबंदीसाठी पाऊल उचलण्यात आले नाही, असे महिलांनी सांगितले. त्यामुळे शेवटी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. टोयागोंदी येथील सर्व महिला २0 किमी अंतरावरून सालेकसा येथे पोहोचल्या. गावात मोर्चा काढून नगर भ्रमण करीत सरळ पोलीस स्टेशनवर धडक दिली. तेथे काही काळ धरणे देत दारूबंदीचा आवाज बुलंद केला व पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांना निवेदन देऊन दारूबंदीसाठी आग्रह धरला.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...