Wednesday, 9 November 2016

कर्जापायी शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

अमरावती, दि.09: महागाईचा आलेख सतत वाढत असला तरी शेतमालाला मात्र, कवडीमोल भाव मिळत आहे. शेतातून उत्पादन खर्चही निघत नसल्याने नैराश्‍य आलेल्या शेतकरी पतीने गळफास घेतला तर पत्नीने विषाचा घोट घेऊन आयुष्य संपविले. हृदयाला पिटाळून लावणारी दुदैवी घटना वरुड तालुक्‍यातील घोराड गावात  मंगळवारी घडली. आतापर्यंत नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करणारे शेतकरी आता शेतमालाला भाव मिळत नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याचे विदारक चित्र विदर्भात समोर आले आहे. 

वरुड तालुक्‍यात घोराड गाव आहे. सुनील शिवाजी घारड (वय 35) यांच्याकडे दोन एकर शेती आहे. काही वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे ते चिंतित होते. त्यांना आठ वर्षांचा मोहित नावाचा मुलगा आहे. दिवाळीच्या सुट्या असल्याने तो नातेवाइकांकडे नागपूरला गेला होता. 

सुनील घारड यांचा गावात पानटपरीचा जोडधंदा होता. सकाळी गावातील दोघे साहित्य खरेदीसाठी त्यांच्या पानटपरीवर गेले. मात्र, ती बंद दिसली. त्यांनी सुनील घारड यांना आवाज दिला; परंतु प्रतिसाद मिळत नसल्याने घराचा दरवाजा त्यांनी ढकलला. तेव्हा सुनील घारड गळफास घेतलेल्या अवस्थेत तर पत्नी प्रतिभा घारड (वय 30) यांनी विष प्राशन केल्याचे आढळले. घटनेची माहिती वरुड पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वरुड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले.
सुनील घारड यांच्याकडे बॅंक, खासगी तसेच सावकाराचे कर्ज असल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. खासगी कंपनीकडून कर्ज भरण्यासाठी त्यांच्याकडे सतत तगादा लावण्यात येत होता. वरुडचे ठाणेदार गोरख दिवे यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे. दिवाळीनंतर लगेचच दोघांही आत्महत्या केल्याने गावात शोकाकुल वातावरण आहेत. सरकार भाववाढीसाठी कोणतेही प्रयत्न करीत नसल्याचा रोष व्यक्‍त करण्यात येत आहे

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...