Monday 2 July 2018

भामरागड तालुक्यात तीन महिलांना जलसमाधी


भामरागड,दि.02ः-हिदूर येथील चार महिला पामुलगौतम नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या असता अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने तीन महिला वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार ३0 जून रोजी घडली. मात्र यातील एका महिलेला पोहता येत असल्याने तिचे प्राण वाचले. सौमी पोरिया दुर्वा (६५), जानकी बिरलू तिम्मा (२७), चंदा रामजी गोटा (१५) सर्व रा. हिदूर ता. भामरागड अशी मृत महिलांची नावे आहेत.
हिदूर गावातील शनिवारी चार महिला पौमुलगौतम नदीपात्रात कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. कपडे धूत असताना अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने चारही महिला पाण्यात वाहू लागल्या. यावेळी एका गुराख्याने धाव घेऊन वाहून जाणार्‍या चार महिलांपैकी एका महिलेचा जीव वाचविला. मात्र सौमी दुर्वा, जानकी तिम्मा, चंदा गोटा या वाहून गेल्या.
घटनेची माहिती मिळताच हिदूर येथील नागरिकांनी सायंकाळपर्यंत नदीपात्रात शोध मोहीम राबविली त्या सापडल्या नाही. त्यामुळे आज सकाळी गावकर्‍यांनी महसूल विभाग व पोलिस प्रशासनाच्यावतीने नदीपात्रात शोध मोहीम राबविली असता सकाळी ११ वाजताच्या सुमारास तिन्ही महिलांचे मृतदेह सापडले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भामरागडच्या रुग्णालयात पाठवले. यावेळी घटनास्थळी तहसीलदार कैलास अंडील यांनी मृत तीनही महिलांच्या कुटुंबीयांना सायंकाळपर्यंत प्रत्येकी ४ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्‍वासन संबंधितांच्या कुटुंबीयांना दिले.

No comments:

Post a Comment

देवरी येथे रक्तदान शिबिर संपन्न

देवरी,दि.10- देवरी येथील श्री साई सेवा समितीच्या वतीने कार्तिक पौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न झाला. श्री साई सेव...