मुंबई उच्च न्यायालयाने आरक्षणाच्या आधारे दिलेल्या बढत्या रद्द करण्याचे निर्देश दिले आहे. तूर्तास हा निर्णय तीन महिन्यांसाठी स्थगित ठेवण्यात आला असला तरी यामुळे सामाजिक व राजकीय वर्तुळात भूकंप आला आहे. संघर्ष वाहिनीच्या पुढाकाराने विमुक्त भटक्या जमातीतील विविध सामाजिक व कर्मचारी संघटनातर्फे रविवारी या विषयावर बैठकीचे आयोजन करण्यात आले. दीनानाथ वाघमारे यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत अॅड. वरुण कुमार, अॅड. नीतेश ग्वालबन्सी, राजेंद्र बढिये, मुकुंद अडेवार, राजू चव्हाण, धनराज खडसे, धर्मपाल शेंडे, किशोर सायगन, वनिता वºहाडे, गोविंद राठोड, अनिल राऊत, शंकर फुंड, गणेश सोनुने आदी पदाधिकारी तसेच विविध संघटनांचे सदस्य उपस्थित होते.
न्यायालयात पदोन्नत झालेल्या कर्मचाºयांच्या कार्यक्षमतेचा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. गेल्या १७ वर्षांपासून पदोन्नती मिळत आहे. त्यामुळे राज्यातील प्रशासन अकार्यक्षम झाले काय, असा सवाल यावेळी करण्यात आला. आरक्षण घेत असलेला समाज हा मागासवर्गीय असून वर्षानुवर्षे वंचित राहिला आहे. त्यांना प्रतिनिधित्व मिळाले नसल्यानेच ही तरतूद करण्यात आली. त्यामुळे सरकारने हा डेटा न्यायालयात सादर करणे गरजेचे होते. मात्र तो देण्यात आला नाही. या निर्णयामुळे १३ वर्षात पदोन्नत झालेले कर्मचारी त्यांच्या पूर्वपदावर अवनत होणार असल्याने शासन प्रशासनात प्रचंड गोंधळ निर्माण होण्याची शक्यता दीनानाथ वाघमारे यांनी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment